मुंबई दि. २९ : खामगाव- जालना येथील रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानसभेत दिली. यासंदर्भातील तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य संजय गायकवाड, कैलास गोरंट्याल यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.
मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, खामगाव- जालना चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून काही ठिकाणच्या रस्त्यांवरील कामासाठी हरकती घेण्यात आल्याने ही कामे प्रलंबित आहेत. तर काही ठिकाणी वनक्षेत्रातील काम करण्याकरिता वन विभागाकडून परवानगी प्राप्त होईपर्यंत विलंब होत असल्याने लवकरच वन विभागाबरोबर याबाबत संयुक्त बैठक घेण्यात येईल. खामगाव- जालना चौपदरीकरणाचे काम तीन टप्प्यात होणार असून याकामात आतापर्यंत ३०० हरकती आल्या असताना २९९ हरकती मार्गी लावण्यात आल्या असून उर्वरित १ हरकत सुध्दा निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.