अमरावती दि २३ : तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्याला बाजारपेठेत योग्य दर प्राप्त होईपर्यंत धान्याची सुरक्षित साठवण करता येणे शक्य होणार आहे. येथील गोदामाच्या निर्मितीमुळे शेतकऱ्यांना धान्य साठविण्याची सुविधा उपलब्ध होणार असून शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी केले.

तिवसा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात 3 कोटी रुपयांच्या निधीतून राज्य वखार महामंडळाचे 2980 मे. टन क्षमतेच्या गोदाम निर्मितीच्या बांधकामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
तिवसा पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, तिवसा नगराध्यक्ष योगेश वानखेडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश साबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सचिन पतंगे, तहसीलदार वैभव फरतारे, खरेदी विक्री संघाचे संचालक दिनेश साव, सुरेश धवणे, अध्यक्ष गजानन अलसपुरे आदी उपस्थित होते.

