परभणी प्रतिनिधी, दि.२३:- अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत लाभार्थींना शिधापत्रिकांवर सवलतीच्या दरात धान्याचा पुरवठा केला जातो. ज्या लाभार्थींना सवलतीच्या दराने धान्य घेण्याची आवश्यकता नाही, अशांनी स्वेच्छेने या योजनेतून बाहेर पडून शासनाला सहकार्य करावे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनिमय, २०१३ अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याकरिता शासनावर येणारा आर्थिक भार कमी होण्याच्या दृष्टीने तसेच योग्य व गरजू लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळावा यासाठी “अनुदानातून बाहेर पडा” (Opt Out of Subsidy) ही योजना सुरू करण्यात आली आहे. अन्नसूरक्षा योजनेमध्ये सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळण्याकरिता पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्याना, जर त्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेणे आवश्यक नसेल तर सवलतीच्या दराने मिळणारे अन्नधान्य नाकारण्याचा पर्याय शासनाने उपलब्ध करून दिला आहे.
तरी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने मिळणाऱ्या अन्नधान्याचा लाभ घ्यावयाचा नसल्यास व देशास बळकट करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग व्हावयाचा असल्यास त्यांनी नव्याने घ्यावयाच्या शिधापत्रिका आणि अस्तित्वात असलेल्या शिधापत्रिकांकरिता mahafood.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या नमुन्यामध्ये आपली संमती दर्शवून अर्ज संबंधित तहसील कार्यालयात जमा करण्याबाबत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आवाहन केले आहे.