देगलूर दि.१५ :- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त येथील परमपूजनीय गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अभ्यासपुरक मंडळ प्रमुख श्री.वसंत वाघमारे तसेच जेष्ठ शिक्षक श्री. सुरेशराव कुलकर्णी इत्यादी शिक्षक व्यासपीठावर उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून श्री .योगेश वझलवार यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील आधारीत माहिती देताना म्हटले की, डॉ.बाबासाहेबांनी आपले उच्च शिक्षण शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व लंडनमध्ये पूर्ण केले. भारतात परतल्यावर त्यांनी ” शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा” अशी जबरदस्त घोषणा केली. त्यांनी २० जुलै १९२४ रोजी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली.

ते मुख समाजाचे नायक झाले. त्यांनी आपल्या अशिक्षित बांधवांना एक दिव्य संदेश दिला “वाचाल तर वाचाल”. वस्तीगृह स्थापन करून निवासाची सोय करून दिली . त्यांना शिक्षण देणे, वाचनालय काढणे ,रात्रीच्या शाळा भरवणे, तरुणासाठी क्रीडा मंडळी चालवणे अशा कार्यावर बहिष्कृत हितकारणी सभेचा भर होता.
शैक्षणिक विचार
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य आणि हक्काची जाणीव होते. यासाठी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाली की ते
पूर्णपणे सुशिक्षित माहिती पूर्ण गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावेत. समाजाच्या सर्व स्तरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिक दृष्ट्या सशक्त होतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केली.
शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत . यासाठी पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना १९४६ साली करून त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व छत्रपती संभाजीनगरला मिलिंद महाविद्यालय सुरू केले .
स्त्री, शेतकरी, श्रमजीवी यांच्या बद्दल विचार
स्त्रियांना पुरुषाप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी दूर व्हावी यासाठी १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात डॉ.बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. १९४२ साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की, मुला-मुलींना शिक्षण द्या. त्यांना महत्त्वकांक्षी बनवा त्यांचा न्यूनगंड
दूर करा असा महत्त्वाचा संदेश दिला. श्रमजीविकांसाठी ते खंबीरपणे उभे राहिले.
प्रखर राष्ट्रप्रेम व राजनिष्ठा
डॉ. बाबासाहेबांच्या आचार व विचारात राष्ट्रप्रेम व राजनिष्ठ भरलेली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तत्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली. डॉ. बाबासाहेबांनी परकीय धर्म स्वीकारला तर संकट येईल , इतर धर्माचे लोक तर तयारच होते . डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आम्ही या भारताची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच राष्ट्रावर संकट आल्यास प्राणप्रणाला लावून देशाचे रक्षण करू यातच डॉ .बाबासाहेब आंबेडकरांची प्रखर राजनिष्ठा समावलेली आहे. अशा प्रकारे त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलची माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. दमन देगावकर, सिताराम नागलगावकर मूल्यमापन विभाग प्रमुख श्री. सुरेशराव कुलकर्णी,श्री. गिरीश दीक्षित, मिलींद जोशी इत्यादी शिक्षक उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.दत्तात्रय मिरलवार यांनी केले.

