नवी दिल्ली प्रतिनिधी दि.०९ :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मलेशियातील चार प्रमुख उद्योगपतींशी चर्चा केली. त्यांनी पेट्रोनासचे अध्यक्ष आणि ग्रुप सीईओ टॅन टेंगकू मुहम्मद तौफिक; बेरजाया कॉर्पोरेशन बर्हाडचे संस्थापक तान दातो’ सेरी व्हिन्सेंट तान ची यिओन; खझानाह नॅशनल बर्हाडचे व्यवस्थापकीय संचालक दातो अमीरुल फैसल वान झहीर; आणि फिसन इलेक्ट्रॉनिक्सचे संस्थापक दातो पुआ खेन सेंग यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी भारत आणि मलेशियामधील व्यवसायांदरम्यानच्या वाढत्या संबंधाचे तसेच भारताच्या विकासाच्या प्रवासामध्ये मलेशियन कंपन्या स्वारस्य दाखवत असल्याचे कौतुक केले. गेल्या काही वर्षांत भारतात व्यवसाय सुलभता वाढविण्यासाठी तसेच स्थिर, कार्यक्षम त्याचबरोबर भरवशाचे व्यावसायिक आणि धोरणात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांचा आणि सुधारणांचा त्यांनी उल्लेख केला.
भारत विशेषतः पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर, एआय म्हणजेच कृत्रिम प्रज्ञा आणि आरोग्यसेवा यासारख्या क्षेत्रात देऊ करत असलेल्या संधींचा शोध घेण्याचे त्यांनी मलेशियातील व्यावसायिकांना आवाहन केले. या अनुषंगाने, ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी क्वालालंपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या १० व्या भारत-मलेशिया सीईओ फोरमच्या बैठक आयोजित करण्यात आल्याचीही त्यांनी प्रशंसा केली . या बैठकीत झालेल्या चर्चांमुळे भारत-मलेशिया व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक दृढ होतील अशी आशा देखील व्यक्त केली.
भारत सरकारने विकसित भारत निर्माण करण्यासाठी केलेल्या सुधारणांचे उद्योग क्षेत्रातील अग्रणींनी कौतुक केले तसेच भारताच्या आर्थिक विकासाच्या वाटचालीवर दृढ विश्वास व्यक्त केला. आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओचा विस्तार करून आणि भारतीय समकक्षांसोबत संयुक्त उपक्रम हाती घेण्याच्या शक्यतेची पडताळणी करून भारतात आपल्या व्यवसायांचा विस्तार करण्याबाबतही त्यांनी उत्सुकता व्यक्त केली.
